कुर्यात सदा दंगलम्‌ !

"शुभे... माझा रुमाल कुठे आहे? डबा भरलास का?"

मोजे घालता घालता राजनने स्वयंपाकघराकडे बघत नेहमीची हाक मारली.

"कॉटवरच आहे बघ. तुझं पाकीटही तिथेच आहे आणि लोकलचा पास, घराची चावी सगळे घेतले आहेस ना. मला यायला आज उशीर होइल. आज देशपांडेकाकांकडे जायचे आहे ना. सुबोध वाट बघत बसेल माझी. कॉटवरच ती फुलाफुलांची पिशवी पण काढून ठेवलीय. आज येताना दादरला उतरून भाजी घेऊन ये. आणि हो रानडे रोडवरच्या त्या मोतीवाले बंधूंकडे माझा मोत्याचा सर पॉलिश करायला दिलाय, तेवढा घेऊन येशील आज? आणि हो, गार्निअर घेऊन येशील का रे आज? तुझे केस फारच पांढरे झालेत. कसं दिसतं ते? "

शुभाने स्वयंपाक करता करताच उत्तर दिले.



मोजे घातले, रुमाल आणि पैशाचं पाकीट खिशात टाकलं आणि तो आरशासमोर उभा राहिला.

" दोनच वर्षात काळ्याचे पांढरे झाले." राजनने स्वतःवरच विनोद केला.



शुभाचं शेवटचं वाक्य ऐकलं आणि डोक्यावरच्या सफेद होत चाललेल्या केसांकडे लक्ष गेलं आणि त्याला एकेकाळचं ते रेशमी वैभव आठवलं. या केसांवर भाळून तर शुभा त्याच्या प्रेमात पडली होती. ते दिवस आठवले आणि राजन क्षणभर तसाच आरशासमोर रेंगाळला. त्याच्याही नकळत त्याचा हात हळूवारपणे केसातून फिरायला लागला..... डोळे कुठेतरी अज्ञातात हरवून गेले......



"अहो... राजे...., पुन्हा एकदा भूतकाळात शिरलात की काय? जागे व्हा? आणि पळा नाहीतर ७.२० चुकेल. भागो-भागो, जल्दी भागो."

शुभाने हलकेच त्याच्या खांद्यावर थोपटत त्याला जागे केले. तसा तो पुन्हा वर्तमानात आला.



"खरेच गं, ते दिवस आठवले की अजूनही नॉस्टॅल्जिक व्हायला होतं. तुला आठवतं? बरोब्बर एक वाजता, दुसर्‍या मजल्यावर जिन्यापाशी येऊन उभा राहायचो मी आणि राघव. मग थोड्यावेळाने तू तुझ्या मैत्रिणींच्या घोळक्याबरोबर तिथे यायचीस आणि हळूच गार वार्‍याची झुळूक येऊन जावी तशी निघून जायचीस. तुला माहीतेय.... जवळजवळ दीड वर्षे.... म्हणजे एफ्.वाय. ला प्रवेश घेतल्यापासून ते एस.वाय. अर्धे होईपर्यंत रोजचा उपक्रम होता माझा हा. रोज ठरवायचो की आज बोलू... आज बोलू... पण धाडसच नाही झालं कधी. राघ्या शिव्या घालून थकला."

मनाने राजन अजून तिथेच होता.



"हो रे... पहिले दोन महिने आम्हालाही काही कळालं नव्हतं. पण नंतर मेघनाच्या लक्षात आलं आणि मग तुझ्या नावावरून मला चिडवणं सुरू झालं. मला फारसा रस नव्हता तेव्हा तुझ्यात, पण तुझे रेशमी केस खूप आवडायचे मला....!"

बोलता बोलता शुभाने पुन्हा एकदा राजनच्या केसातून हात फिरवला. आता थोडेसे विरळ व्हायला आले होते, पांढरेही झाले होते. प्रत्येक दिवशी आयुष्याशी चाललेल्या लढाईत एकेक वीर धारातीर्थी पडत चालला होता. पण होते ते अजूनही तसेच मऊसूत होते. तिने केसातून हात फिरवला आणि राजन पुर्णपणे भानावर आला.

"ए चल... उशीर होतोय. ७.२० चुकेल माझी. मी पळतो. संध्याकाळी दादर स्टेशनवर वाट बघतो तुझी. नेहमीच्याच ठिकाणी ४ नं. प्लॅटफॉर्मवर ."



"राजा... अरे मला उशीर होइल आज. साडे आठ तरी वाजतील. आज सुबोधकडून 'आसावरी' घोकून घ्यायचाय. गेले दोन शनिवार-रविवार त्याच्यावरच खपतोय पठ्ठ्या !"



"होवू दे ना मग. मी थांबेन ना! तुझ्यासाठी एवढे तरी नक्कीच करू शकतो मी. किंबहुना सद्ध्या तरी एवढेच करू शकतो गं मी."

बोलता बोलता राजनच्या डोळ्यात पाणी आले... तशी शुभाने त्याच्या पाठीत धपाटा घातला..



"राजे पळा आता, उशीर होतोय. मी कधी तक्रार केलीय का? मग...?"

राजनने एकदा भरल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहिले आणि भरकन डबा उचलून घराच्या बाहेर पडला.



******************************************************************************



राजन अरविंद मोहिते. सातार्‍यापासुन तासाभराच्या अंतरावर असलेल्या एका गावातील एका सधन शेतकर्‍याचा मुलगा आणि आज एका छोट्याशा खाजगी कंपनीत खर्डेघाशी करणारा एक सामान्य कारकून. शुभांगी राजन मोहिते... त्याची पत्नी..... अगदी ऐश्वर्या राय नसली तरी नाकी डोळी नीटस.... सुबक ठेंगणी म्हणता येईल अशी. पुर्वाश्रमीची शुभांगी गोडबोले. सातार्‍यातील ख्यातनाम फौजदारी वकील नानासाहेब गोडबोल्यांचं लाडकं शेंडेफळ. चिरंजीव दिवटे निघाल्यानं त्यांच्या सार्‍या आशा लेकीवर एकवटलेल्या.......



........ सद्ध्या ती देखील एका खाजगी कंपनीत स्वीय सहाय्यक म्हणून काम करत होती. त्याबरोबरच दोन विद्यार्थ्यांना गाणेही शिकवायची. सोमवार-मंगळवार ठाण्याच्या निनाद साठ्येंची मुलगी स्नेहा आणि शनिवार रविवार दादरच्या अनिरुद्ध देशपांडेंचा मुलगा सुबोध. राजन आणि शुभा सातार्‍याला कॉलेजला शिकत असताना एकमेकाच्या प्रेमात पडले आणि एका विवक्षित क्षणी लग्नाचा निर्णय घेतला गेला. टिपीकल फिल्मी कहाणीप्रमाणे आंतरजातीय विवाहाला दोघांच्याही घरातून विरोध. त्यामुळे घरातून पळून जाऊन लग्न केलेले. स्थिर झाल्याशिवाय अपत्याचा विचार करायचा नाही असे ठरवून टाकलेले. तेव्हापासून गेले दोन वर्षे सतत आयुष्याबरोबर झगडा सुरूच होता. पण आहे त्या परिस्थितीत दोघे सुखात होते.



लोकल पूर्णं वेगात सी. एस. टी. कडे धावत होती. ट्रॅकच्या बाजूला असणार्‍या इमारती, झाडे त्याच वेगाने मागे पडत होती आणि राजनचे मन भूतकाळात घिरट्या घालायला लागले होते.



"राजा, आठवड्याभरात कॉलेज संपेल आणि मग आपल्याला कुठलाही निर्णय घेणे कठीण जाईल."

शुभे , पण अजून मला नोकरी नाही. एकदा लग्न केले की आंतरजातीय असल्याने आमचा आग्यावेताळ आपल्याला दारातही उभे करणार नाही. तू अशी सधन घरात वाढलेली......!"

नाही म्हटले तरी त्याच्या शब्दाने शुभा थोडीशी दुखावलीच.



"दीड वर्षात हेच ओळखलेस का मला?"

तसा राजन वरमला...

"ओके...बाबा कान पकडतो, सॉरी डिअर, यापुढे अजून काही बोलू नकोस? डन....आपण लग्न करतोय.....! फक्त मला एक महिन्याचा कालावधी दे. बर्‍याच गोष्टी कराव्या लागतील. अगदी राहत्या घरापासून ते नोकरीपर्यंत. प्लीज एवढा वेळ देच मला."

राजन अगदी अजिजीने बोलला तशी शुभाची कळी खुलली.



"आत्ता कसा योग्य मार्गावर आलास. तू ना राजा, अगदी अस्सा आहेस. सगळीकडे मीच पुढाकार घ्यायचा का? अगदी प्रपोज करण्यापासून ते लग्नाची मागणी घालण्यापर्यंत.......!"

राजनने आपले दोन्ही कान पकडले. तसा मागून कुणीतरी त्याच्या पाठीत एक जोराचा धपाटा घातला.....

राजनने मागे वळून बघितले तर राघव, सतीश, सुंदर, मेघना, शशी सगळाच ग्रुप उभा होता.



"एकदाचा निर्णय झाला तर. चलो लेट्स पार्टी !" राघवने आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये घोषणा केली.



"अबे पार्टी तर करूच पण पुढचं काय? फक्त एक महिना आहे माझ्या हातात आणि सगळ्या तयार्‍या करायच्यात. आमचा आग्यावेताळ तर घराबाहेरच काढणार बहुतेक मला. मग लग्नाला त्याची काही मदत होण्याचं तर सोडाच."

राजन थोडा चिंताग्रस्त झाला होता खरा. खरेतर त्याचे आई-वडील स्वभावाने खूप चांगले होते. पण शाण्णव कुळीचा जन्मजात ताठा होता. त्यातूनही एकदम "बामणाच्या पोरीबरुबर लगीन" म्हणजे वडील कंबरेत लाथ घालून घराबाहेर काढणार याची खात्री होती.



"तू नको बे टेन्शन घेऊ. आम्ही आहोत ना. हे बघ, कल्याणला खडकपाडयात आमची एक खोली आहे. वनरुम किचन म्हण हवे तर. ती काय आम्ही वापरत नाही. बाबा, भाड्याने द्यायची म्हणत होते. ती तुम्हाला देऊ..... भाड्याचे बघू तुला नोकरी लागले की काही तरी टेकवू पिताश्रींच्या हातांवर....., हाय काय आन नाय काय !"

सतीशने महत्त्वाचा प्रॉब्लेम चुटकीसरशी सॉल्व्ह करून टाकला तशी राजाने त्याला कडकडून मिठीच मारली.



"आता राहता राहिला नोकरीचा प्रश्न तर तुला एखादी चांगली नोकरी लागेपर्यंत माझ्या बाबांच्या फर्ममध्ये पार्टटाईम क्लार्क म्हणून तुला चिटकवून घेण्याची जबाबदारी माझी. फक्त मग रोज तुला कल्याण ते चर्चगेट असा प्रवास करावा लागेल."

मेघनाने एक जबाबदारी उचलली आणि राजनच्या डोळ्यात पाणीच आले. भरल्या डोळ्याने त्याने शुभाकडे पाहिले तर तिच्या डोळ्यात नेहमीप्रमाणेच....



"ऑल इज वेल" आणि वर, "बघ किती सोप्पंय सगळं, तू उगीचच काळजी करतो आहेस" असे भाव !

तिने फक्त मेघना आणि सतीशचे हात हातात घेऊन घट्ट धरून ठेवले. तसे सतीशने हलक्या हाताने तिच्या डोक्यावर एक टपली मारली...

"बावळट, आफ्टरऑल वुई आर फ्रेंड्स! "

बरं चला, आता आधी शिवसागरवर धाड टाकूया आणि तिथे बसूनच काय ते ठरवू पुढचे."

राघवला खादाडीशिवाय दुसरे काही सुचत नव्हते आणि स्पॉन्सर नेहमी तोच असायचा त्यामुळे कुणाचीच ना असण्याचेही कारण नव्हते.

मग शिवसागरला पोटोबाची आळवणी करतच पुढचे प्लॅनिंग झाले.





ठरल्याप्रमाणे शुभाने अगदी शांत राहायचे होते. मेघना, शशी आणि सुंदर शुभासाठीची खरेदी करणार होत्या. तर राघव, सत्या आणि राजन स्वतः बाकीच्या गोष्टी ठरवणार होते. म्हणजे लग्न कुठे करायचे, कसे करायचे, त्यासाठीची सर्व प्रकारची तयारी. आणि हे सर्व करत असताना कमालीची गुप्तता बाळगायची होती. कारण शुभाचे वडील सातार्‍यातील प्रसिद्ध फौजदारी वकील असल्याने त्यांचा चांगलाच वचक होता, त्यात भाऊ वाया गेलेला, गुंडात जमा होणारा. म्हणजे त्या पातळीवर एक वेगळेच युद्ध लढावे लागणार होते.



............

..................

............................................



दोन दिवसानंतर राघव, सतीश आणि राजन शाहूपुरीच्या चौकात आप्पा मिठाईवाल्याची जिलबी खात उभे होते.

"राजा, रजिस्टर मॅरेजची कल्पना कशी काय वाटते? कायदा आपल्या बाजूने आहे, तुम्ही दोघेही सज्ञान आहात, भीती नाहीच ती कसली?" इति राघव.

"राघ्या वेडा की काय तू...., शुभाचे वडील फौजदारी वकील आहेत आणि म्हातारा पक्का सनातनी बामण आहे. कुणी चुकून बोलला त्यांच्याजवळ तर सगळेच बोंबलेल, मग शुभाही नाही आणि लग्नही नाही, बसा बोंबलत. तो सणकी म्हातारा फौजदारी वकील आहे. कुठलेतरी चार पाच खोटेनाटे खटले लावून देईल माझ्या मागे. मग बसतो एक तर बिनभाड्याच्या खोलीत जाऊन नाहीतर कोर्टाच्या खेट्या मारीत. अहं... काही तरी वेगळा मार्ग शोधायला हवा."

"हे बघ हे इथे जिलबी खात बसलेत. तिकडे शुभीचे नाना तिचं लग्न पक्कं करून आलेत. राजा जिलब्या कशाला खातोहेस, महिनाभर थांब... आपण शुभीच्या लग्नाचे लाडूच खायला जाऊ. काय गं शशे?"

शशी आणि मेघनाने भयंकरच बातमी आणली होती. मेघनाने आपली स्कुटी साइडला पार्क केली आणि त्यांच्याजवळ येता येताच मोठा बाँबशेलच टाकला.



"काहीतरीच काय बोलतेस मेघे? शुभी मला बोलली असती ना?" राजन हबकलाच.

"आता माझ्या तोंडून शुभीच बोलते आहे असे समज. आणि तिला माहीत असेल तर ती बोलणार ना राजा तुला. जी गोष्ट तिलाच माहीत नव्हती, नपेक्षा कालच कळलीय ती तुला दोन दिवसांपूर्वी कशी काय सांगणार होती?"

"ए मेघे नीट सांग काय झालेय ते." राघव मध्ये पडला.

" अरे सकाळी हॉस्टेलवरची माझी रूममेट शुभीची ही चिठ्ठी घेऊन आली."

मेघीने हातातली चिठ्ठी पुढे केली. राजन ती चिठ्ठी वाचायला लागला तोवर मेघीने कहाणीचे सूतोवाच केले....



" माझी रूममेट दीप्ती, शुभीबरोबर गाण्याच्या क्लासला असते ना ती दात्यांकडे, तिच्याकडे शुभीने ही चिठ्ठी दिली. कसे कोण जाणे पण तुमचे पराक्रम शुभाच्या दिवट्या बंधुराजांना कळले. मला वाटते, कॉलेजमधल्या कुणीतरी चुगली केली असावी. आणि त्याने कधी नव्हे ते इमानदारीत ही बातमी बापापर्यंत पोचवली. तुला तर माहितीच आहे नानासाहेब किती पझेसिव्ह आहेत या बाबतीत ते. नानासाहेबांनी रातोरात कोल्हापुरला जाऊन आपल्याच एका मित्राच्या मुलाशी शुभीचं लग्न फिक्स करून टाकलं.

आणि राजन शेवटची बातमी खास तुझ्यासाठी.....

शुभी सद्ध्या नजरकैदेत आहे असे समजायला काही हरकत नाही. अर्थात माझ्यासारख्या जवळच्या मैत्रिणी तिला भेटू शकतात अजूनही. पण शुभीला घराच्या बाहेर पडायला बंदी आहे. कुणी ना कुणी सतत तिच्या बरोबर असतेच. मघाशी मी आणि शशी तिच्याकडे गेलो तर रव्या, तिचा भाऊ हॉलमध्येच ठिय्या मांडून बसला होता. त्याच्या बरोबर त्याचे ते टगे मित्रही होते. बहुतेक नानासाहेबांनी यावेळी लेकाशी सलोखा केलेला दिसतोय.

नालायक, कसा खोदून खोदून विचारत होता मला.



" तू ओळखत्येस का त्या मुल्लाल्ला? त्याचे नॅव काय? क्युठ्ये राहत्तो? लुबरा मेला!" बोलताना असा दिसत होता की आत्ता लाळ टपकायला लागेल्...शी SSSSS ! "

मेघनाने एका दमात सगळे सांगून टाकले. रव्याबद्दलचा तिचा सगळा संताप तिच्या शब्दातून ओसंडून वाहत होता.



"मग तू त्याला राजनची माहिती दिलीस का?"

राघ्याने मूर्खासारखे विचारले तशी मेघी मांजरीसारखी फिस्कारून त्याच्या अंगावर आली.

"एवढी मूर्ख वाटते का मी तुला?"

"आत्ता..., वाटत नाहीस..., पण कुणी सांगावं...? दिसतं तसं नसतं ना... म्हणून तर जग फसतं !".......

राघवने विनोद करून वातावरण थोडं हलकं करायचा प्रयत्न केला. पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही.



"राघ्या... विनोद नको. आता पाणी डोक्यावरून चाललंय. " राजन गंभीर झाला होता.... काहीतरी करायला हवं."

"पण आपण काय करणार राजन, तिचा भाऊ निव्वळ गुंड आहे. वडील फौजदारी वकील असल्याने पोलीसही त्यांच्या बाजूने असतील. आय थिंक... माफ कर पण मला वाटतं तू विसर आता शुभीला. चांगल्या मित्रांसारखे आपण तिच्या लग्नाला जाऊ.... शुभमंगल सावधान असे म्हणून अक्षता टाकून मोकळे होवू. तुला कोणी ना कोणी मिळेलच चांगली."

शशी राजनचं सांत्वन केल्या सारखं म्हणाली, पण ती पुर्णपणे गंभीर होती.



"सावधान......!"

इतक्या वेळ शांतपणे जिलबी खात असलेला सत्या पहिल्यांदाच मध्ये बोलला. तसे सगळे चमकून त्याच्याकडे बघायला लागले.

"सत्या, अजून वेळ आहे त्याला महिनाभर!"

राघ्या ओरडला तसा सत्या आधी हसला आणि मग गंभीर झाला.

"राजा... पृथ्वीराज बनायची तयारी आहे का? आणणार संयोगितेला पळवून?"

"तुला काय वाटलं? तिचा तो रानगट भाऊ आपलं हार तुरे घेऊन स्वागत करणार आहे. आणि समजा आणलं पळवून सातार्‍याच्या बाहेर पडता येईल का आपल्याला? "

"पुढचं माझ्याकडे लागलं. तू तिला पळवून आणणार का नाही ते सांग?"

"आपली तयारी आहे. त्यासाठी पृथ्वीराजच काय चंबलका डाकू भी बन सकता है हम."

राजन गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाला.



"मग झालं तर! मेघे तू काहीही कारण सांगून फक्त एक तासाकरता तिला घराबाहेर काढू शकशील?"

सत्याच्या पाताळयंत्री मेंदूची चक्रे हालायला लागली.

"घराबाहेर काढणं अवघड नाही रे. पण तो बोका असणारच ना तिच्या बरोबर सारखा!"

"त्याचं टेन्शन तू नको घेऊ. त्याला कसा येड्यात काढायचा ते मी बघतो. तू फक्त तिला काहीही करून एक तासाभरासाठी कॉलेजवर घेऊन ये. काहीही कारण सांग... सगळ्या मैत्रिणी मिळून तिला लग्नाबद्दल पार्टी देताहेत म्हणून सांग. फारतर त्या रव्याला पण आमंत्रण दे. ती फक्त कॉलेजपर्यंत यायला हवी. तिथे त्या रव्याला कसं गुंतवायचं ते मी बघतो. राजा तू माझी बाइक घेऊन लायब्ररीच्या मागच्या मैदानात तयार राहशील. शुभी गाडीवर बसली की गाडी सरळ फलटण चौकापर्यंत आणायची. तिथं हा राघ्या सुमो घेऊन तयार असेल, सुमो थेट सांगोल्याकडे पळवायची. सांगोल्यात माझा मामा असतो. त्या रात्री त्याच्याकडे मुक्काम करायचा, दुसर्‍या दिवशी सकाळी पंढरपुरात. तिथे कुठल्यातरी मठात देऊ लग्न लावून दोघांचं.

फक्त एक लक्षात ठेवायचं... यदाकदाचित आपला प्लॅन फुटला आणि त्याने पाठलाग केलाच तर सांगोला येईपर्यंत गाडी थांबवायची नाही. एकदा सांगोल्यात पोचलास की थेट मामाचं घर गाठायचं. मग तिथे रव्या येऊ दे नाही तर आणखी कोणी, आपण कोणाच्या बापाला भीत नाही! दुसर्‍या दिवशी सकाळी या दोघी बसने पंढरपुरात पोचतील.. काय?"

सत्याने झटक्यात सगळा प्लॅन ठरवून..., सांगूनही टाकला.



"आज सोमवार आहे. येत्या रवीवारी दुपारी तीन वाजता तू शुभीला घेऊन कॉलेजवर येशील मेघे.......! डन? "

सत्याने हात पुढे केला.

"डन...!" मेघी, राजन आणि राघ्याने त्याच्या हातावर हात मारून स्वीकृती दिली.

"अरे पण शुभीचं काय? ती तयार होइल का याला?" शशीने महत्त्वाचा प्रश्न विचारला.

"तिला निर्णय घ्यावाच लागेल. तुम्ही दोघी तिला भेटून, योग्य ती संधी साधून शुभीला कल्पना द्या. मला खात्री आहे, ती तयार होईलच."

सत्या कुठेतरी शून्यात बघत बोलला.



"ए मला भीती वाटते रे. तो रव्या आणि त्याचे मित्र फारच दांडगट आहेत." शशी थोडीशी घाबरली होतीच.

"हे बघ शशे, एकदा का लग्न लागलं की मग रव्याच काय तिचा तो वकील बापही काही करू शकणार नाही."

"सत्या.... तुझा सांगोल्याचा मामा काय करतो रे?"

राघवने कुतूहलाने विचारले. कारण त्या मामाच्या जोरावर सत्या रव्यासारख्या सातार्‍यातल्या टग्याशी टक्कर घ्यायला निघाला होता.

"भेटशील तेव्हा मामालाच विचार की?" सत्याने डोळे मिचकावले.

"ठीक आहे मी सुमो ठरवतो." राघू म्हणाला.

" आजच ठरव.... आणि शक्य असेल तर त्या गजानन ट्रॅव्हल्सची गाडी ठरव. नाही...नाही... गजाननचीच गाडी हवी आपल्याला."

"त्याला पक्के सांग आपल्याला राजा आणि त्याच्या होणार्‍या बायकोला, रव्याच्या बहिणीला घेऊन जायचेय म्हणून. तो गजानन दोस्त आहे आपला. मीही बोलतो त्याच्याशी. तो लागेल ती सगळी मदत करेलच. जाताना गजाला तीन-चार पोरंही घ्यायला सांगू बरोबर."

सत्या खुसखुसत बोलला...

"तुझी न त्या गजाची कशी काय दोस्ती रे? त्याच्यात आणि त्या रव्यात काय फरक आहे?"

राजन प्रथमच मध्ये बोलला. त्याचा सुर शंकेचा होता.... तसा सत्या कुजकटासारखा हसला.

"आपली दोस्ती नाय लेका गजाशी, पण रव्याची दुश्मनी आहे ना त्याच्याशी... या केसमध्ये रव्याची बहीण आहे हे समजले की गजा आपल्याला वाट्टेल ती मदत करायला तय्यार होईल. दुश्मन का दुश्मन अपना दोस्त ! काय....?

ए पोरींनो तुम्ही सुटा..कामाला लागा.आणि ही बातमी सुंदरला पण द्या. नाहीतर ऐनवेळी ती काहीतरी घोटाळा करायची. मेघे, शशीला सोडल्यावर मला जुन्या राजवाड्यापाशी भेट."

"ठीक आहे.....!" दोघी स्कुटीवर बसून निघून गेल्या.



"दोस्तांनो, एक छोटासा बदल आहे योजनेत....!"

सत्याच्या सुपीक डोक्यातून एकामागून एक किडे वळवळायला लागले होते.

त्याने पुढची योजना त्या दोघांना सांगायला सुरुवात केली तशी दोघांचे चेहरे खुलायला लागले.

"डन यार... सत्या !" भन्न्नाट आयडियेची कल्पना आहे. त्या दोघींनाही सांगायला हवे." राजन खुशीत आला.

"ते काम मी करेन, तू नको टेन्शन घेऊ. फक्त एक लक्षात ठेव राघ्या... एकदा का दोघांना घेऊन गाडी सुटली की सांगोल्यात मामाचं घर येईपर्यंत थांबायचं नाही. घरी पोचला की रव्याचा देवसुद्धा तुला टच करू नाय शकणार. त्याच्याआधी जर का त्याच्या हातात सापडलास तर रव्या तुझी भगर करेलच पण आपला सगळा प्लॅन पण फिसकटेल. या दोघांचं लग्न मग कधीच नाही होवू शकणार लक्षात ठेव."

सत्याने इशारा दिला.

"तू बघच बे सत्या... हा राघू काय करतो ते?" राघूने उत्साहाच्या भरात बाइक काढली आणि निघून गेला.

"चला नवरदेव तुम्हाला तुमच्या रूमवर सोडतो. आजची रात्र काय तो आराम करा, उद्यापासून बरीच कामं आहेत."

सत्यानं बाइकला किक मारली, मागे बसता बसता राजनने विचारलं...

"सत्या तुझं डोकं एवढं भन्नाट कसं काय चालतं रे?"

"हड रे... आपल्याला कुठे एवढं डोकं आहे. आपण माकडांचे वंशज आहोत... विसरला का? आपलं काम , आपला धर्म.... अनुकरण करणे!"

सत्या खदखदून हसला.

"अनुकरण?" राजनच्या चेहर्‍यावर भले मोठे प्रश्नचिह्न होते.

तशी सत्याने मागे वळून त्याच्या डोक्यात एक टपली मारली.

"सुशि झिंदाबाद !"

गाडी चालवता चालवता राजनच्या चेहर्‍यावर उमटलेलं संभाव्य प्रश्नचिह्न इमॅजिन करून सत्या जोरजोरात हसायला लागला.



************************************************************************



ठरल्याप्रमाणे मेघना आणि शशी शुभीच्या घरी पोहोचल्या.



"हे बघा काही पार्टी बिर्टी नाही करायची. महिनाभरावर तिचं लग्न आलंय. मला आता आणखी रिस्क घ्यायची नाहीय."

नानासाहेबांनी सरळ एक घाव दोन तुकडे करून टाकले.



"काका असं काय करता. प्लीज येऊ द्या ना तिला. आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून शेवटचेच भेटणार आहोत. एकदा कॉलेज संपलं की प्रत्येक जण आपल्या आपल्या आयुष्यात गुंतून जाणार. मग कुठे भेट होणार आहे. प्लीज शुभीला परवानगी द्या ना तुम्ही. हवेतर रवीदादाला पण येऊ द्या आमच्याबरोबर म्हणजे काही प्रॉब्लेम आला तर तो सांभाळून घेईल रवीदादा !"

बोलताना मेघीने दादा या शब्दावर जरा जास्तच भर दिला, तसा रव्या उचकला.

"ए आपल्याला एक बहीण आहे तेवढी पुरेशी आहे. अजून नकोत सतराशे साठ."

"असं रे काय करतोस दादा. मला कुठे सख्खा भाऊ आहे. तुझ्या रूपात एक भाऊ मिळतोय म्हणून मी खूश होत होते तर तुझं हे असं..... ठीक आहे.... माझ्या नशिबातच नाही भावाचं सुख. आम्ही आपलं मनातल्या मनातच म्हणत राहायचं....

"भैय्या मेरे राखीके बंधनको निभाना....."

मेघीच्या डोळ्यातून पाणी यायचेच काय ते बाकी राहिले होते. शुभी, नानासाहेब तिच्याकडे बघतच राहिले.



"ठीक आहे गं पोरी, आणि तुला रे काय प्रॉब्लेम आहे रव्या. केवढी गोड पोरगी आहे, भाऊ मानतेय तुला. जरा सुधरा आता...! ठीक आहे गं पोरी, पण एक तासभरच आणि रव्या येईल तुमच्याबरोबर."

"थँक यू वेरी मच, काका !"

मेघनाने आनंदाने उडी मारायचीच काय ती बाकी ठेवली होती. शुभी तिच्याकडे वेड्यासारखी बघत होती, काय चाललेय ते तिला कळायला मार्गच नव्हता. मेघीने हळूच तिला डोळा मारला. तशी तिची ट्यूब पेटली. नक्कीच काहीतरी शिजत होतं. नंतर एकांतात मेघीने आणि शशीने तिला सगळे काही समजावून सांगितले.



"मेघे पण रव्याने विचारलं की पार्टी कुठे आहे तर? त्याला काय सांगणार? कारण प्रत्यक्षात तिथे कुठलीच पार्टी नसणार आहे."

शशीने शंका काढलीच.

"कोण म्हटले पार्टी नाही म्हणून... आपली लाडकी मैत्रीण लग्न करून सासरी चाललीय. तिला निरोप द्यायला नको. आपण पार्टी तर देणार आहोतच. पार्टीही असेल अन सगळ्या मैत्रिणीही असतील. आता तिचं सासर नानासाहेबांनी ठरवलेल्यापेक्षा वेगळं असेल हा भिन्न मुद्दा आहे. पण पार्टी तर होणारच."

मेघीनं डोळे मिचकावले.



*******************************



ठरल्या दिवशी रव्या शुभीला घेऊन पार्टीच्या ठिकाणी म्हणजे कॉलेजच्या हॉस्टेलवर पोहोचला.



"दादा, पार्टी पहिल्या मजल्यावर आहे. तू वर नको येऊस. सगळ्या मुलींना ऑकवर्ड वाटेल. तू इथे खालीच थांबना प्लीज."

रव्याच्या मनात वर पार्टीच्या ठिकाणी यायचे होते खरे तर. पण मेघीने 'प्लीज'वर दिलेला जोर पाहता त्याच्या हातात चरफडण्याशिवाय फारसे काही राहिले नाही.



"ए भावड्या, एक एकशेवीस तीनशे लाव रे." रव्या खालच्या पानपट्टीवर येऊन उभा राहिला.



"च्यामारी.... आजकाल बहिणीची रखवालदारी करायला लागला बघ हिरो!"

"पर्याय नाही बाबा, गेली कुणाचा तरी हात धरून पळून म्हणजे?"



"ए साल्या, कोण बे तू? दात आले का?" रव्या त्या दोघा पोरांवर भडकला.



"ए हिरो, रागपट्टी कुणाला देतो? गजाभाऊच्या माणसांना. हाडं न्हायीत र्‍हायची जाग्यावर.आपल्या बहिणीला संभाळ आधी."

त्यातल्या एका छाडमाड हिरोने रव्याला आवाजी दिली तसा रव्या अजूनच भडकला.



"तुज्या तर, रत्तलभर वजन नाय तुजं, तू रव्याला आवाजी देतो. थांब तुला दाखवतोच."

रव्या तावातावाने त्याच्यावर तुटून पडला. त्यांची चांगलीच जुंपली. या मारामारीच्या नादात शुभी कधी उतरून खाली आली आणि कॉलेजच्या मागच्या बाजूला निघून गेली हे त्याच्या लक्षातच आले नाही.



थोड्याच वेळात मेघी आणि शशीही गपचुप खाली उतरल्या. मेघीने स्कूटीला किक मारली.

"ए शशे, बस लवकर!"

"मेघे तू नीघ, मला एक छोटंसं काम आहे स्टँडपाशी. मी रिक्षाने जाते. उद्या ठरल्याप्रमाणे पंढरपुरातच भेटू."

मेघी तिच्याकडे बघतच राहिली.



इकडे लायब्ररीच्या मागे राजन सत्याची बाइक घेऊन शुभीची वाटच बघत होता. शुभी येताना दिसली आणि त्याने गाडीला किक मारली. फलटण चौकात राघ्या वाट बघत होता सुमो घेऊन. गाडीत गजाननची आणखी चार-पाच पोरं होती. जर वेळ आलीच आणि रव्याने पाठलाग केलाच तर त्याच्याशी सामना करायला कोणीतरी हवे ना. स्टिअरिंगवर स्वतः गजाच होता.

"गजाभाऊ... थेट सांगोल्याकडे निघायचं. पण आपण सांगोल्याकडे निघालोय हे त्यांना कळायला नकोय. दोन तीन तास तरी निदान फिरवत ठेवायचं बघा त्यांना."

राघूने सूचना केली.

"पण राघवभौ, त्यांना आपण सांगोल्याकडेच पळणार आहोत हे कसे कळणार. मुळात रव्याला आपली बहीण पळाली आहे हे कळायलाच अजून तासभर जाईल. तो येडा बसला असेल पार्टी संपायची आणि त्याची बहीण खाली येण्याची वाट बघत. आन त्याची बहीण हितं आपल्याबरोबर सांगोल्याला चाललीय. लै भारी प्लॅन हाये देवा!"

गजाला नुसत्या कल्पनेनेच गुदगुल्या होत होत्या. रव्याशी दुश्मनी काढायला तो नेहमीच तयार असायचा आणि ही तर नामी संधी होती. त्याने गाडी सुसाट काढली.

"नाही गजाभौ..., त्याला आत्तापर्यंत कळलेदेखील असेल. कदाचित तो आणि त्याची गँग सांगोल्याकडे जाणार्‍या रस्त्यावर आपली वाट बघत असतील. आजकाल भिंतीबरोबर हवेलाही कान असतात गजाभाऊ!"

राघव खुसखुसत बोलला तसा गजा त्याच्याकडे बघायला लागला.

"कायबी असो, आपल्याला काय त्याचं? पण रव्या भेटावाच वाटेत.... लै दिवस झाले हाताची खाज भागवून..!"

गजाचे हात शिवशिवायला लागले.

"हां... हां... गजाभौ... तुम्हाला जे काय करायचे ते करा पण आम्हाला सांगोल्याला पोचवल्यावर."

राघूने पुन्हा एकदा खबरदार केले गजाला.

"बरं बाबा, सांगोल्यात गेल्यावर तर आणखीन बरं व्हईल."

"राघू... सगळं होइल ना रे व्यवस्थित?"

राजनकडे बघत शुभीने विचारलं तसं राघू नुसताच हसला.

"काळजी करू नकोस शुभे... बोला पुंडलिक वरदा हारी विठठल.... उद्या पंढरपुरात यावेळेपर्यंत तुम्ही नवराबायको झालेले असाल."



राघूची शंका खरी ठरली, रव्या त्याच्या गँगसकट पोचला होता. पण गजासारखा कसबी ड्रायव्हर असताना भीती कशाची? गजाने सरळ अ‍ॅक्सेलरेटरवरचा जोर अजून वाढवला. त्याने गाडी सरळ सातार्‍यात पुन्हा घुसवली. तसा राघू चमकला....

"काळजी करू नको दादा, गजाने एकदा शब्द दिला म्हणजे दिला. थोडं खेळवू या ना रव्याला सातार्‍याच्या गल्ली बोळातून मग निवांत लागू सांगोल्याच्या रस्त्याला. माझ्यावर सोड मर्दा."

गजाने हमी भरली तसा राघू आश्वस्त झाला. गजाने गाडी गल्ली बोळातून फिरवायला सुरुवात केली. रव्या आणि त्याचे मित्रही त्यांचा पाठलाग करतच होते. शुभी कमालीची भेदरली होती. त्या भेदरण्याने ती राजनला अजूनच चिकटली. तिचा तो स्पर्श ......

जर दुसरी वेळ असती तर.......

पण सद्ध्या तिला धीर देत राहणे हेच राजनच्या हातात होते. आणि ते तो इमाने इतबारे करत होता.



तिकडे मेघी सत्याकडे पोचली.

तिला एकटीलाच येताना पाहून सत्या स्वतःशीच हसला.

"मला माहीत होतं तू एकटीच येणार ते."

"म्हणजे....?"

"सोड ते.....नंतर सांगेन सगळं. बस गाडीवर..."

मेघीने तिची स्कूटी पार्क केली आणि सत्याच्या बाइकवर बसली. सत्याने गाडीला किक मारली.......



**************************************************************************



"थांब साल्या. रव्याच्या बहिणीला पळवणं एवढं सोपं वाटलं होय रे."

"गजाभाऊ... रव्याच्या हातात गुप्ती आहे."

राजन घाबरलाच होता.

"काळजी करू नको राजनभौ, आपण पण काय अगदीच चिंधी नाय हाय. हे बघ....!"

राजनच्या शेजारी बसलेल्या गजाच्या एका माणसाने सिटखाली लपवलेली तलवार दाखवली. तशी शुभी रडायलाच लागली.

"काळजी करू नको ताई. वकिलाच्या पोरावर तलवार चालवायला आमी काय येडे नाय. पण अगदीच जीव वाचवायची वेळ आली तर असावी म्हणून जवळ ठेवलेली आहे."

गजा समजावणीच्या सुरात बोलला तसा शुभीच्या जिवात जीव आला.



आतापर्यंत शुभी आणि राजन पळाल्याला दीड तास होवून गेला होता. गजाने गाडी सांगोलारोडला काढली. रव्या आणि त्याची गँग पाठलागावर होतीच. पण सुदैवाने त्यांच्याकडे गजासारखा कसबी ड्रायव्हर नसावा. गजाने सुसाट वेगात गाडी काढली. दोन- अडीच तासात गाडी सांगोल्यात प्रवेश करत होती. रव्याची गाडी पाठीमागे होतीच.



"आता काय करायचं रे राघू ? तुझ्या त्या सत्याच्या मामाचं घर कुठे आहे ते सांग, म्हणजे गाडी तिकडे घेतो."

"अहं आंणखी थोडा वेळ गाडी अशीच फिरवीत राहा भाऊ."

राघूच्या मनात काही वेगळेच चालले होते.

"असं काय करतो राघू, गाडी घेऊ दे ना सरळ मामाच्या घराकडे. आठवतं ना सत्या काय म्हणाला होता ते.. एकदा मामाकडे पोचलं की मग रव्याचा देव पण हात नाही लावू शकणार आपल्याला."

"काय करू रे भाऊ?"

सांगोल्याच्या गल्ल्यातून गाडी फिरवताना गजाने विचारले.

"मला एक सांग गजाभाऊ. तुला काय बघायला आवडेल. रव्याचा पराभवाने एवढासा झालेला चेहरा की त्याचं मार खाऊन सुजलेलं शरीर?"

गजा विचारात पडला.



"माराचं काय? त्याला मी कधीही ठोकू शकेन... पण मला त्याचं हरलेलं, एवढंसं झालेलं थोबाड बघायला आवडेल."

गजाने विचार करून उत्तर दिलं. असंही त्याला रव्यावर मात करण्यात स्वारस्य होतं. रव्याला मान खाली घालायला लावण्यात जी मजा होती ती मारामारीत थोडीच येणार होती.



"राजन किती वाजले?"

राघवने विचारलं......!

"सात-साडे सात झाले असतील....; का रे?"

गजाभाऊ गाडी साइडला घ्या. आपण सरेंडर करणार आहोत. तसा गजा चमकला.

"काय? हल बे... आपण अशी हार नाय मानणार. हाणू साल्याला.....!"

"गजाभाऊ प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. हार रव्याचीच होणार आहे. नाहीतरी विनाकारण मारामारी करून नंतर तुरुंगात जाण्यापेक्षा गपचुप बसून मजा बघणं जास्ती चांगलं नाही का."

राघव बोलला तसा गजा अजून बुचकळ्यांत पडला.

"आपल्याला कायपण कळत नाय बग भौ.....!"

"माझ्यावर विश्वास ठेवा, गजाभौ..... रव्याचं एवढंसं झालेलं थोबाड बघायचं ना तुम्हाला."

राघूने हसून खात्री दिली तशी गजाने एका साइडला घेऊन गाडी थांबवली. लगेच त्याचे सगळे पंटर हत्यारं काढून तय्यार झाले. तशीच वेळ आलीच तर फुकट मार का म्हणून खा?



रव्याची गाडी मागे येऊन थांबली आणि रव्या त्याच्या गँगसोबत खाली उतरला. सगळे जण तावातावातच सुमोकडे आले तशी गजा आणि त्याचे पंटर हत्यारासकट खाली उतरले. तसा रव्या चमकला. गजा इथे असेल अशी त्याने अपेक्षाच केली नव्हती. त्याने पोरांना सबुरीचा इशारा दिला. इथे परक्या गावात राडा करण्यात धोकाच होता नाहीतरी.

"हे बघ गजा, आपली दुश्मनी आहे आणि ती तशीच चालत राहणार. पण इथे प्रश्न माझ्या बहिणीचा आहे. तेव्हा गुपचुप तिला आमच्या स्वाधीन कर. आपलं भांडण आपण नंतर बघू."

गजा काही बोलायच्या आतच राघू गाडीतून खाली उतरला.

"हे बघा दादा..., तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. इथे तुमची बहीण नाहीये. आम्ही सगळे पंढरपुरला चाललोय दर्शनाला. सांगोल्यात माझा मामा राहतो म्हणून जाता जाता थोडा वेळ त्याच्याकडे थांबणार होतो."

"मग हा गजा तलवारी घेऊन काय विठोबाच्या पायावर वाहायला निघाला होता का?"

"हत्यारं आपल्याकडं न्हेमीच असत्यात. तू पाठलाग करत होतास. देवाला निघालो होतो म्हणून आधी चुकवायचा प्रयत्न केला म्हणलं देवदर्शनात राडा नको. पण तू पिच्छा सोडायलाच तयार नाहीस म्हणून जाब विचारायला थांबलो. मारामारीच करायची असेल तर आमीबी काय बांगड्या न्हायीत भरलेल्या."

गजा गुरगुरला तसा राघू पुढे झाला.

"ओ दादा, हवी तर तुम्ही गाडीची तपासणी करा... बघा तुमची बहीण सापडते का?"

तसा गजाने आ वासला. राजन आणि ती रव्याची बहीण गाडीत अजूनही असताना हा येडा असा काय करतोय? राघूने त्याला हळूच डोळा मारला. गजाला काहीही समजत नव्हते... मेंदूच्या बाबतीत तो पक्का गुडघा होता. शेवटी जे होइल ते बघायचा निर्णय त्याने घेतला आणि पोरांना इशारा केला.



रव्या गाडीकडे गेला. आत बसलेल्या सगळ्यांना त्याने खाली उतरवलं.

गाडीतून उतरणार्‍यांकडे त्याने एकवार पाहिलं आणि राघूकडे वळला.

"ए राघ्या, नाटकं बास झाली. तुला काय वाटलं तुझ्या नाटकांना फसेन होय मी. मला सगळा प्लॅन माहीत आहे तुमचा. गपगुमान सांग्..शुभी आन तो राजा कुठाय?"

गजा टकामका एकदा त्याच्याकडे, एकदा राघूकडे तर एकदा नुकतेच गाडीतून उतरलेल्या राजन आणि शुभीकडे बघायला लागला. च्यायला हे काय झेंगाट?

ही पोरगी जर रव्याची बहीण... शुभी नाही, तर मग कोण आहे?



"कुणी रे... तिनं सांगितलं तुला. राघ्याने रव्याच्या गाडीत मागच्या बाजूला बसलेल्या त्या व्यक्तीकडे इशारा केला. तशी शशी गाडीतून खाली उतरली.

"अरे ही तर 'सुंदर' आहे आणि हा आमच्या कॉलेजचा शिपाई... संभाजी. मग राजन आणि शुभी कुठे आहेत?"

शशी बुचकळ्यांत पडली.



"वा शशे चांगली मैत्री निभावलीस. तुझ्यासारख्या मैत्रिणी असतील तर शुभीला शत्रूंची काय गरज आहे."

राघू शशीवर चांगलाच संतापला होता. शशीने काही न बोलता मान खाली घातली.

"म्हणजे सत्याचा संशय बरोबरच होता तर. तुझं आणि या रव्याचं काहीतरी आहे हे त्याला माहीत होतं. ठरलेली प्रत्येक गोष्ट तुझ्याकडून रव्याला कळणार याची त्याला खात्री होता. म्हणूनच त्या दिवशी तू आणि मेघी निघून गेल्यानंतर त्याने प्लॅन बदलला. अर्थात मेघीला आतापर्यंत कल्पना आली असेलच याची.



बाय द वे, रव्या ..... आत्तापर्यंत सातार्‍याच्या राम मंदिरात राजन आणि शुभीचं लग्न लागलं असेल. लग्नात तू काही गोंधळ घालू नयेस म्हणून तुला तीन चार तास सातार्‍याच्या बाहेर काढण्याची जबाबदारी माझी होती, ती मी पार पाडली. त्यात हा संभा आणि सुंदर या दोघांबरोबरच गजाभाऊंची पण चांगलीच मदत झाली. अर्थात मूळ प्लॅन काय आहे ते फक्त मी , राजन आणि सत्या आम्हालाच माहीत होतं.



माफ करा गजाभाऊ, तुम्हाला अंधारात ठेवलं आम्ही पण ते गरजेचं होतं. रव्या, आता तू मला मार, हाण नाहीतर काहीही कर, आपल्याला पर्वा नाही. दोस्तीखातर एवढं करणं शक्य होतं मला मी ते केलं. त्यांचं लग्न आतापर्यंत लागलं असेल, आता तू काहीही करू शकत नाहीस. माझं जे होइल ते होइल....आता पुढे इश्वरेच्छा."

राघव शांतपणे हाताची घडी घालून उभा राहिला.



रव्याला काहीच सुचेनासं झालं. सालं या टिनपाट पोरांनी त्याला पद्धतशीरपणे बनवलं होतं. त्याला सातार्‍याच्या बाहेर काढून त्याच्या बहिणीचं लग्न सातार्‍यातच लावून दिलं होतं. या सगळ्या प्रकरणात त्याचा मात्र पद्धतशीरपणे मामा करण्यात आला होता. त्याचं ते पडलेलं थोबाड बघून गजा खदखदून हसायला लागला.



"राघू भौ, मानलं राव तुमाला आणि तुमच्या त्या सत्याला. कसला भारी चु...... बनवलात या रव्याला. जबरा प्लॅनिंग होतं राव. लै भारी. सॉलिड मजा आली राव. ए रव्या.. जा...जा सातार्‍याला परत आता....! निदान बहिणीला सासरी जाण्यापूर्वी एखादी भेट तरी होइल."

गजा आणि कंपनी जोरजोरात हसायला लागली.



रव्याने रागारागाने गाडी स्टार्ट केली. तशी शशी आणि त्याची सगळी दोस्तकंपनी गाडीत बसून निघून गेली.

गजाने राघूला कडकडून मिठी मारली.

"जबरा राव... लै भारी . चार तास तुमाला घेऊन फिरतोय. शंका पण आली नाही की गाडीत बसलेली माणसं कुणी दुसरीच आहेत. चला आपण पण जाऊ सातार्‍याला. त्यो रव्या तिथं काही गोंधळ घालायला नको. चला.....!"

आणि गजाभौनी गाडी सातार्‍याकडे वळवली.



"राघुभाऊ निदान सतीशरावांच्या मामाकडं एकेक कप चहा तरी घेतला असता ना?"

संभाने न राहवून विचारलं तसा राघू खुसखुसून हसायला लागला.

"येड्या सत्याला कोणी मामाच नाही? त्यानं रव्यालाच मामा बनवला."



***************************************************************************



राजन दादरला चार नंबरवर वाट पाहत होता. साडे सात आठच्या दरम्यान क्लास आटपून शुभी आली.

"सॉरी राजा, तुला खुपा वाट बघायला लागली असेल ना?"

"काही होत नाही गं त्याने. माझी अर्धी कादंबरी वाचून झाली तोपर्यंत."

राजनने पुस्तक बंद करून खांद्यावरच्या बॅगेत टाकले.

"कुठलं वाचतोयस?"

"हृदयस्पर्ष.... सुशिचं!"

"ओहो लौकिक आणि मैत्राली.... बरोबर ना? पारायणं केलीत मी त्या पुस्तकाची. तुला कुठे मिळालं आज हे पुस्तक?"

"अगं सत्या भेटला होता सकाळी चर्चगेटला. त्याने दिलं... म्हणाला आजच्या दिवशी या सारखी दुसरी कुठली भेट नसेल तुझ्यासाठी."

"अय्या सत्या, त्याला घरी यायला सांगितलेस की नाही मग? किती दिवस झाले नाही भेटून?"

"हं आमचाही तोच विषय झाला आज. बहुतेक येत्या रवीवारी भेटायचे ठरतेय. कळवतो म्हणालाय. बघू... राघू आणि मेघीशी देखील बोलू. जमल्यास एक छोटंसं स्नेहसंमेलन करू."

"वाव किती मज्जा येईल ना?"



"शुभे, आज चौपाटीवर जाऊ या? बाहेरच कुठेतरी जेवण करूया आज. छान रात्री उशीरापर्यंत फिरू आणि शेवटची लोकल पकडून जाऊ घरी."

"काय राजे, आज भलत्याच मूडमध्ये दिसताय? ठीक आहे जशी आपली आज्ञा."



दोघेही फिरत फिरत चौपाटीवर पोहोचले. चौपाटीवर आज थोडी जास्तच गर्दी होती. दोघे हातात हात घालून मनसोक्त भटकले. चौपाटीवर भेळ, पाणीपुरी खाल्ली. शेवटी दमून एका ठिकाणी बसले.



"शुभे, एक विचारू?"

"विचार ना?"

"तू सुखी तर आहेस ना? माझ्याबरोबर पळून येऊन लग्न केल्याचा पश्चाताप तर होत नाहीये ना तुला?"

"असं का विचारतो आहेस, राजा? मी कधी कुठल्या गोष्टीबद्दल तक्रार केलीय? हा निर्णय आपण विचार करूनच घेतला होता ना? आणि हे दिवस कायम का राहणार आहेत? आयेंगे मेरी जान... हमारे भी दिन आयेंगे. एक दिवस आपण आपल्या कारने इथे येऊ."



शुभाने हळूच आपला एक हात राजनच्या गळ्यात टाकला आणि त्याच्या आणखी जवळ सरकली. राजनने तिच्या खांद्यावर टाकलेला आपला हात हळूच काढून घेतला. बॅगेतून एक छोटीशी पुडी काढली. ती उघडून तिच्यातला मोगरीचा गजरा बाहेर काढला आणि हळुवारपणे शुभीच्या केसात माळला.



"राजन........."

"शू... काही बोलू नकोस... जस्ट फिल इट....

अँड....

हॅप्पी वॅलेंटाईन्स डे माय स्वीट हार्ट.....!"

शुभी आवेगाने त्याला चिकटली. राजनने आपला हात तिच्या गळ्यात टाकला आणि बघता बघता दोघेही समोर दिसणार्‍या त्या अथांग समुद्राच्या सहवासात जगाला विसरून गेले.


Happy Valentines day























समाप्त.

****************************************************************************



तळटीप : यातील मुलीच्या भावाला वेड्यात काढून लग्न करायची कल्पना माझ्या एका मित्राने मला सांगितली होती. त्याच्या मते ती बहुदा सुशिची एखादी लघुकथा असावी. मी काही ती कथा वाचलेली नाही, पण ती कल्पना मात्र इथे वापरलीय. कथावस्तू, स्थळ, पात्रे, संवाद सर्वकाही माझे आहे. पण मूळ कल्पना जर खरोखर सुशिंची असेल तर त्याचे श्रेय सुशिंना मिळायलाच हवे. जर कथा जमली असेल तर ते श्रेय सुशिंचे आहे, जर बिघडली असेल तर तो माझा दोष आहे. माझी ही पहिली वहीली प्रेमकथा त्या माझ्या आवडत्या लेखकाला कै. सुहास शिरवळकर यांना सादर समर्पित.






लेखक: विशाल कुलकर्णी.

४ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

विशालभौ. गोष्ट चांगली आहे पण खूप पाल्हाळ लावलंय. राग मानू नका.जरा आटोपशीर लिहायला शिका.

कौस्तुभ

Kanchan Karai (Mogaraafulalaa) म्हणाले...

गोष्ट छानच जमली आहे. मात्र स्पष्टपणे एकच सांगावंसं वाटतं की हा लेख ’हास्यगारवा’ पेक्षा ’शब्दगारवा’मधे अधिक शोभून दिसला असता.

अवांतर - मला माझ्या स्पष्टवक्तेपणाबद्दल अजिबात शंका नाही शिवाय खिलाडूवृत्तीने मला स्वत:च्याही चुका मान्य करायला आवडतात म्हणून Anonymous प्रतिक्रिया देऊन, नुसतं नाव न लिहीता माझ्या आयडीवरूनच प्रतिक्रिया देत आहे. (हे अवांतर आपल्यासाठी नाही विशालजी.)

विशाल विजय कुलकर्णी म्हणाले...

कौस्तुभ आणि कांचनकराई..

प्रतिसादाबद्दल धन्यवाद. पहिली गोष्ट जेव्हा ही कथा मी पाठवली तेव्हा हा हास्य विशेषांक असणार आहे हेच मुळी माहिती नव्हते. ते नंतर देवकाकांशी बोलल्यावर उमजले पण तोवर वेळ हातातून गेली होती.
आणि कौस्तुभ, तुमच्यासाठी म्हणुन, तुम्ही जे म्हणताय ते लघु-लघुकथेसाठी ठिक आहे. ही कथा मी एका मासिकासाठी लिहीतोय हे गृहीत धरुन लिहीली होती. त्यामुळे प्रत्यक्ष मासिक (हार्ड कॊपी) आणि ई- विशेषांक यांच्यात अपेक्षित असलेली साईझ यात थोडी गल्लत झाली. त्यामुळे कथा अपेक्षेपेक्षा मोठी झालेय हे मान्य पण या व्यतिरिक्त पाल्हाळ म्हणाल तर मला तो आरोप मान्य नाही. कारण यातला कुठलाही उल्लेख वगळला तर कथेचा रस निघुन जाईल. बाकी पुन्हा एकदा प्रतिसादाबद्दल (आणि स्पष्टवक्तेपणाबद्दल) धन्यवाद.

सुधीर कांदळकर म्हणाले...

प्रत्येक दिवशी आयुष्याशी चाललेल्या लढाईत एकेक वीर धारातीर्थी पडत चालला होता.

मस्त.

पण कथेच्या लांबीपेक्षां मला वेगळीच गंमत वाटली. पात्रें, नातीं यांचा माझ्या मनांत गोंधळ भरपूर होतो. पात्रें भरपूर, वळणें भरपूर, मूळ कथा कोणती, कथेंतली कथा कधीं सुरुं होते कांहीं कळलें नाही. म्हणजे या वळणाची सूचना मला जाणवली नाहीं. पण त्यामुळें कथेंतली गंमत जास्तच वाढली आणि पक्की विनोदी कथा झाली. राजा आणि शुभीच्या बाजूनें आणि रव्याच्या विरोधांत मीं होतोंच. एखादा वेगवान फार्सच पाहिल्यासारखें वाटलें. त्यांतहि पात्रांचा बराच गोंधळ असतो. छान. मजा आली. पहिला प्रयत्न यशस्वी. पु.ले.शु.